
अंबाजोगाई प्रतिनिधी:- (सय्यद नईम) : अंबाजोगाई – शहराने स्वच्छतेच्या बाबतीत राज्यात दुसरा क्रमांक मिळवूनही, कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या संपामुळे काही दिवसांपूर्वी शहरात कचऱ्याचे ढिगारे, दुर्गंधी आणि नागरिकांच्या नाराजीने सगळ्यांना धक्का दिला. या सर्व गोंधळाच्या पार्श्वभूमीवर, एक नाव पुन्हा अंबाजोगाईकरांच्या चर्चेत आले – स्वच्छता अधिकारी अनंत वेडे.
अलीकडेच बीड नगरपरिषदेत बदली झालेल्या वेडे यांची अनुपस्थिती अंबाजोगाई शहरावर चांगलाच परिणाम करत होती. कर्मचाऱ्यांचा थकीत पगार व 18 महिन्यांच्या PF च्या मागणीसाठी सुरु असलेला कामबंद आंदोलन, स्थानिक राजकीय पुढाऱ्यांच्या मध्यस्थीने काही अंशी निवळले खरे, पण समाधानकारक सुटका होत नव्हती.
या संपूर्ण कालखंडात शहरातील स्वच्छता पूर्णपणे ठप्प झाली होती. रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग, दुर्गंधी आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. मात्र, अनंत वेडे यांची बीड येथून बदली रद्द होऊन अंबाजोगाईत पुनरागमन झाल्यावर अवघ्या तीन दिवसांत शहराला पुन्हा एकदा स्वच्छतेची झळाळी मिळाली.
त्यांच्या कुशल नेतृत्वामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावर परत आणण्यात यश आले. स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेत, त्यांनी तात्काळ उपाययोजना करत शहरात पुन्हा स्वच्छता व्यवस्था सुरळीत केली.
नगरपालिकेचे कर्मचारी आणि नागरिक यांच्यात समन्वय साधून, संपूर्ण शहरात पुन्हा एकदा ‘स्वच्छ अंबाजोगाई, सुंदर अंबाजोगाई’ हे चित्र दिसू लागले.
अनंत वेडे हे केवळ एक अधिकारी नसून, शहराच्या स्वच्छतेचे खरे हिरो ठरले आहेत. त्यांच्या पुनरागमनाने केवळ शहर नव्हे तर नागरिकांचाही आत्मविश्वास परत आला आहे.