
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) चे मराठवाडा विभागीय अध्यक्ष अक्षय भुंबे यांची निवेदनाद्वारे मागणी
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
तालुक्यातील तळेगाव तांडा या ठिकाणी विहिरीचे खोदकाम सुरू होते. यावेळी विहिरीचे होल घेताना मोठा स्फोट झाला. या स्फोटात चौघे जण गंभीर जखमी झाले. गंभीर जखमींपैकी एक जणाचा जागीच मृत्यू झाला. तर मजूर भारत तुकाराम पवार यांच्या शरीराच्या विविध भागांवर अणकुचीदार दगड उडून लागले. यामुळे त्यांचा एक डोळा कायमचा निकामी झाला आहे. तर शरीरातील रक्तवाहिन्यांना गंभीर इजा पोहोचली आहे. त्यामुळे जिलेटीन स्फोटातील मरण पावलेल्या व गंभीर जखमींना शासनाने तात्काळ मदत करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) चे मराठवाडा विभागीय अध्यक्ष अक्षय भुंबे यांनी तहसिलदार व उपविभागीय अधिकारी यांना मंगळवार, दिनांक १७ जुन रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) चे मराठवाडा विभागीय अध्यक्ष अक्षय युवराज भुंबे यांनी अंबाजोगाईचे तहसिलदार व उपविभागीय अधिकारी यांना या प्रकरणी निवेदन दिले आहे. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना भुंबे यांनी सांगितले की, भारत तुकाराम पवार (रा.तळेगाव, ता.अंबाजोगाई) हे विहीरीचे खोदकाम करताना जिलेटीन स्फोट (ब्लास्ट) होऊन त्यांचा डोळा निकामी झाल्यामुळे कायमचे अपंगत्व आले असल्यामुळे सदरील काम करणाऱ्या गुत्तेदार यांच्याकडे जिलेटीन सारख्या स्फोटक भारी पदार्थ बाळगण्याचे व त्याचा व्यवसायासाठी वापर करण्याचा परवाना (लायसन्स) नसताना ते वापरल्यामुळे त्या गुत्तेदारांवर तात्काळ गुन्हा दाखल करून मजूर भारत तुकाराम पवार यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक १८ मार्च २०२५ रोजी उत्तम पांडुरंग आडे (रा.तळेगाव तांडा, ता.अंबाजोगाई.) यांच्या विहीरीचे खोदकाम करीत असताना जुन्या होल मध्ये जिलेटीन असल्यामुळे नवे होल घेताना त्याचा स्फोट होऊन भारत तुकाराम पवार, धनराज अनंत दहीफळे, जीवन हरिश्चंद्र दहीफळे, तुकाराम विठ्ठल दहीफळे हे चौघेजण गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी धनराज अनंत दहीफळे हे जागीच मरण पावले होते. या प्रकरणी दिनांक २२ मार्च २०२५ रोजी बर्दापूर पोलिस स्टेशनला विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु, या प्रकरणातील फिर्यादी व आरोपी हे एकाच गांवचे व एकमेकांचे नातेवाईक असल्यामुळे त्यांनी आपसांत हे प्रकरण मिटवले की, काय अशी आमची शंका आहे. कारण, सदरील प्रकरणात जप्त केलेली ट्रॅक्टर, पोकलेन ही वाहने बर्दापूर पोलिसांनी सोडून दिली आहेत. यामुळे मजूरी करून आपल्या कुटुंबाचा सांभाळ व उदरनिर्वाह करणारे भारत तुकाराम पवार यांच्यावर अन्याय होत आहे. तरी या प्रकरणातील दोषी आरोपींविरूद्ध बर्दापूर पोलिसांनी भारत तुकाराम पवार यांचा नव्याने (एफ.आय.आर.) नोंदवून उचित कार्यवाही करण्यासाठी उपविभागीय अधिकारी आणि तहसिलदार यांनी आदेशीत करावे व पीडीतास न्याय मिळवून द्यावा, शासनाने सर्वोतोपरी मदत आणि सहकार्य करावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) चे मराठवाडा विभागीय अध्यक्ष अक्षय भुंबे यांनी केली आहे. निवेदन देताना भिमशक्तीचे संघटक धीमंत राष्ट्रपाल, सामाजिक कार्यकर्ते जीवन गायकवाड, मिनाताई लोंढे यांच्यासह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) चे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
=======================