
अंबाजोगाई (प्रतिनिधी) : धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा लाभ मिळावा, या प्रमुख मागणीला घेऊन मागील आठ ते नऊ महिन्यांपूर्वी लातूर येथे उपोषण, विविध आंदोलने झाली. समाज बांधवांनी संविधानामध्ये अनुसूचित जमातीच्या सूचित धनगर जमात समाविष्ट असल्याचे सांगून अंमलबजावणी केली जात नसल्याचा आरोप लावला होता. यावर धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा लाभ देण्यासाठी तत्कालीन शिंदे सरकारने सकारात्मक प्रतिसाद ही दिला होता. परंतु, फडणवीस सरकार सत्तेवर येवून आता दीडशे दिवस पूर्ण झाले आहेत. तरी परंतु, अद्याप ही याबाबत फडणवीस सरकार याप्रश्नी गंभीर नाही. बहुतेक निवडणुकीत आरक्षण देतो असे सांगून धनगर समाजाची मतं घेऊन सत्तेवर आलेल्या महायुती सरकारला दिलेल्या आश्वासनाचा विसर पडला आहे. त्यामुळे महायुती सरकारने दिलेला शब्द पाळून धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करीत आरक्षणाचा तिढा संपवावा. अन्यथा अन्यथा धनगर समाज नव्याने आंदोलन करेल असा इशारा धनगर समाजाचे नेते चंद्रकांत हजारे यांनी राज्य सरकारला दिला आहे.
या प्रश्नी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना धनगर समाजाचे नेते चंद्रकांत हजारे यांनी सांगितले की, महाराष्ट्रात धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा गेली अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. यावर राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन, उपोषण करण्यात आली. यात धनगड जमातीच्या एका कुटुंबातील सहा जणांचे धनगड जमातीचे प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी केली होती. यावर राज्य सरकारने ही मागणी पूर्ण करून धनगड जमातीचे प्रमाणपत्र ही रद्द केली आहेत. त्यानंतर पुढे आरक्षणाच्या अंमलबजावणीचा मुद्दा उपस्थित झाला. परंतु, विधानसभा निवडणुक आदर्श आचारसंहिता लागल्याने तो तसाच प्रलंबित राहिला. तरीही धनगर समाजाचे नेते चंद्रकांत हजारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा मुद्दा सतत लावून धरला होता. महाराष्ट्रात धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा बाजूला पडावा, समाजाला विसर पडावा म्हणून महायुती सरकारने त्यांच्या मर्जीतील धनगर समाजातील काही मोजक्या नेत्यांना लाल दिवा, मंत्री पदाचा दर्जा, सभापतीपद आणि आमदारकी बहाल केली आहे. धनगर समाज आरक्षण आंदोलनाचा फायदा याच मोजक्या धनगर नेत्यांना झाला आहे. संपूर्ण धनगर समाजाला नाही. हे मोजके नेते म्हणजे संपूर्ण धनगर समाज नव्हे असे मल्हार योद्धा चंद्रकांत हजारे यांनी सरकारला ठणकावून सांगितले आहे. जर धनगर आरक्षणाची महाराष्ट्रात अंमलबजावणी केली नाही तर धनगर समाजाला पुन्हा एकदा तीव्र आंदोलन उभे करावे लागेल असा इशारा आंदोलक हजारे यांनी महायुती सरकारला दिला आहे.
धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करा :
राज्यात धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची मागणी गेली काही महिन्यांपासून जोर धरून होती. त्यामुळे राज्यातील महायुतीच्या सरकारने मागणीसंदर्भात सकारात्मक असल्याचे सांगितले. दोन वेळा मंत्रालयात बैठका ही झाल्या. त्यातच आचारसंहिता लागली. त्यामुळे आरक्षणाचा मुद्दा पुढे ढकलण्यात आला. धनगर समाजाने मतदानरूपी दिलेल्या पाठिंब्यामुळेच राज्यात पुन्हा महायुती सरकार सत्तेवर आले आहे. हे विसरू नका, त्यामुळे महायुती सरकारने दिलेला शब्द पाळला पाहिजे. अन्यथा धनगर समाजाला पुन्हा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल याची केंद्र व राज्य सरकारने नोंद घ्यावी.
~ चंद्रकांत हजारे,
(आंदोलक, धनगर समाज आरक्षण)