
अंबाजोगाई (प्रतिनिधी):- अंबाजोगाई पंचक्रोशीतील महिलांचा आर्थिक स्तर उंचावण्याच्या उदात्त हेतूने केवळ महिलांनी महिलांसाठी साधारणतः नऊ वर्षा पूर्वी सुरू करण्यात आलेल्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले महिला नागरी सहकारी पतसंस्थेस ३१ मार्च २०२५ अखेर रुपये ३ लक्ष एवढा नफा झाल्याची माहिती पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ . सुनीता राजकिशोर मोदी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे .आपला भारत देश हा पुरुष प्रधान संस्कृतीचा देश आहे . देशात महिलांना जरी दुय्यम स्थान देण्यात आले असले तरीही आजची महिला ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्यासोबत उभा राहण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे नेहमी घर, चूल आणि मूल यामध्येच गुरफटून पडलेल्या महिलांना काही प्रमाणात आर्थिक स्वायत्तता मिळवून देण्यासाठी व महिलांचा आर्थिक स्तर उंचावून त्याचा फायदा कुटुंबाला व्हावा याच पवित्र हेतूने केवळ महिलांसाठीच राजकिशोर मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले महिला नागरी सहकारी पतसंस्थेची निर्मिती करण्यात आल्याची माहिती पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ. सुनीता राजकिशोर मोदी यांनी दिली. या पतसंस्थेच्या आर्थिक व्यवहार व विकासाच्या दृष्टीने पर्यायाने अंबाजोगाई शहरातील महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी संस्थेच्या उपाध्यक्षा डॉ. धाकडे राजश्री राहुल , सचिव खडकभावी शोभा बाबू , तसेच संचालिका डॉ. धर्मपात्रे रुपाली सुधीर, सरवदे संगीता विष्णू , मसने उषा गणेश, मस्के अंजली विष्णुपंत , रापतवार सविता विजय , खंडाळे सुरेखा बाबुराव , फारोखी परवीन नुजहत, मोहिते सायली सुहास त्याचबरोबर चोकडा जमुना जयप्रकाश यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे . ३१ मार्च २०२५ अखेर पतसंस्थेच्या सभासदांची संख्या ही २३१५ एवढी असल्याचे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. त्याचबरोबर संस्थेचे भागभांडवल हे रुपये २५लक्ष एवढे असून पतसंस्थेच्या एकूण ठेवी या रुपये ५ कोटी असल्याचे सांगून मार्च २०२५ अखेर पतसंस्थेने समाजातील महिलांना रुपये ३ कोटीचे अर्थसहाय्य ( कर्जवाटप) करून त्यांचा पर्यायाने त्यांच्या कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न केला आहे. सावित्रीमाई फुले पतसंस्थेची अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँकेत ०३ कोटीची गुंतवणूक देखील केली असल्याचे सुनीता मोदी यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे. पतसंस्थेचा स्वनिधी हा रुपये ४१ लक्ष एवढा जमा असल्याची माहिती अध्यक्षा सुनीता राजकिशोर मोदी यांनी प्रसिद्धीपत्रकात दिली आहे. ३१ मार्च २०२५ अखेर पतसंस्थेस रुपये ०३ लक्ष एवढा नफा झाल्याचे अध्यक्षा सुनीता मोदी यांनी सांगत या यशाचे सर्वस्वी श्रेय पतसंस्थेचे मार्गदर्शक राजकिशोर मोदी यांच्यासह पतसंस्थेच्या ठेवीदार ,सभासद आणि महिलांनी घेतलेल्या कर्जाचा वेळेवर परतावा यालाच द्यावे लागेल असेही सौ सुनीता मोदी म्हणाल्या. आजमितीला संस्थेत ०३ कर्मचारी यामध्ये शाखा व्यवस्थापक सागर कंगळे यांच्या समवेत सचिन काशीद , अनिल काळे व अंकुश माने हे कर्मचारी कार्यरत आहेत .तसेच ०१ नित्य निधी ठेव प्रतिनिधी सुध्दा संस्थेच्या कामात मोलाचा वाटा उचलत असल्याचे अध्यक्षा सौ. सुनीता राजकिशोर मोदी यांनी जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकातून सांगितले आहे.