लातूर (प्रतिनिधी) दि. १९: येथील विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचा जिमखाना विभाग व विद्यार्थी समुपदेशन व रोजगार कक्षाच्या वतीने कौशल्य व व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.बाबासाहेब ठोंबरे, प्रमुख पाहुणे कृषि महाविद्यालय, डोंगरशेळकी, उदगीरचे प्राचार्य डॉ.अंगद सूर्यवंशी, प्रमुख मार्गदर्शक आई सेंटर प्रो चे संचालक तथा सुप्रसिद्ध प्रेरणादायी वक्ते सर नागेश जोंधळे, प्रा.राहुल सुरवसे व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विष्णू रोडे हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्ज्वलनाने झाली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.बाबासाहेब ठोंबरे म्हणाले की, यशस्वी होण्याकरीता शिस्त, निष्ठा, समर्पण व निर्धार आवश्यक आहे. व्यक्तिमत्व विकासावर लक्ष केंद्रित करून विद्यार्थी त्यांच्या जीवनाची गुणवत्ता वाढवू शकतात. यावेळी प्रमुख मार्गदर्शक विश्वविक्रमवीर लेखक सर नागेश जोंधळे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, महाविद्यालयीन जीवनात आपण निवडलेल्या विषयांचा अभ्यासासोबतच सामाजिक कौशल्ये, भावनिक बुद्धिमत्ता, सहकर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करणे, कोणत्याही कार्यात स्वतःहून पुढाकार घेणे, नेतृत्व करणे, सूचनांचे पालन करणे, काम वेळेवर पूर्ण करणे, व्यक्तिमत्व गुणांचे संयोजन, प्रभावी संवाद इत्यादी कौशल्ये विकसित केल्याने आपला आत्मविश्वास वाढण्यासाठी मदत होते तसेच पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेत असतानाच असे कलागुण अवगत केल्याने तरूण वयातच अधिक परिपक्वता येते व आपणास मोठे यश नक्की मिळते असा विश्वास व्यक्त केला. ध्येय प्राप्ती व प्रगती करण्यासाठी विद्यार्थींनी कौशल्य व व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष देणे आवश्यक आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले. विद्यार्थ्यांनी स्वतःला स्वीकारावे, स्वतःचा अभिमान बाळगावा, संयम व आत्मविश्वास ठेवावा असे मत डॉ.अंगद सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.

कार्यशाळेच्या समारोपावेळी प्रमुख पाहुणे डॉ.दिनेशसिंह चौहान यांनी सांगितले कि यश प्राप्तीसाठी विद्यार्थ्यांनी परिश्रमवृत्ती, अभ्यासूवृत्ती, सातत्य, प्रयत्न, ध्येय यांचबरोबर व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. कार्यशाळा यशस्विरित्या संपन्न झाली व विद्यार्थ्यांना निश्चित या कार्यशाळेचा लाभ होईल असा अभिप्राय सुमित तारख, वैष्णवी धांडगे व डॉ.योगेश भगत यांनी व्यक्त केला. जिमखाना उपाध्यक्ष डॉ.अच्युत भरोसे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंदन कोरडे व समृध्दी भरात्पे या विद्यार्थ्यांनी केले. तर उपस्थितांचे आभार डॉ.राहुल चव्हाण यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ.सारिका भालेराव, डॉ.भास्करराव आगलावे, डॉ.महेंद्र दुधारे, डॉ.रमेश ढवळे, डॉ.विद्या हिंगे, मनीषा बगाडे, सुरेखा आंबटवाड, अश्विनी गरड, वीरभद्र दुरुगकर, संगीता सोरेकर उपस्थित होते.